डॉ. सुभाष दळवी ह्यांचा विशेष सन्मान सोहळा संपन्न.
‛गुरुदक्षिणा फाउंडेशन’ च्या वतीने नुकताच डॉक्टर सुभाष दळवी यांचा एक विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. मूळ बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असणारे डॉ. दळवी ह्यांना महाराष्ट्र राज्याच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख समन्वयक म्हणून नुकतेच नियुक्त करण्यात आले. सदर सन्मान सोहळा त्याच निमित्ताने आयोजित करण्यात आला होता.
मूळ विलेपार्ले निवासी असणाऱ्या डॉक्टर दळवी यांना विलेपार्ल्याचेच आमदार पराग अळवणी यांच्या शुभहस्ते या निमित्ताने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी मंचावर सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, माजी नगरसेवक अभिजीत सामंत आणि कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक मोहन भिडे आदी मंडळी उपस्थित होती.
1997 साली पहिल्यांदा नगरसेवक झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कामकाज पाहताना डॉक्टर दळवीं सारखा सर्व कामांमध्ये हिरीरीने भाग घेणारा अधिकारी पाहून आनंद झाला आणि नक्कीच ही व्यक्ती एक वेगळा ठसा उमटवणार हे त्याचवेळी लक्षात आल्याचे प्रतिपादन आमदार अळवणी यांनी या निमित्ताने बोलताना केले.सचिन खेडेकर यांनी अशा अधिकाऱ्यांच्या सोबत सदैव उभे राहण्याची इच्छा बोलून दाखवली तसेच अभिजीत सामंत यांनी डॉक्टर दळवीं सारखे अधिकारी सोबत असले की काम करायला हुरूप येतो आणि अर्थातच काम देखील उत्कृष्ट प्रतीचे होते असे गौरव उद्गार यानिमित्ताने काढले.
डॉक्टर दळवी यांनी त्यांचं हे कार्य म्हणजे एक वसा आहे आणि तो त्यांच्या समवेत सर्वच समाजाने घेतला तरच आपला महाराष्ट्र हा स्वच्छ होईल हा विश्वास बोलून दाखविला आणि त्याचबरोबर महाराष्ट्र व पर्यायाने मुंबई देखील स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांना प्रतिज्ञाबद्ध केले.
डॉक्टर दळवी यांच्यावर प्रेम करणाऱ्या समाजातील अनेक व्यक्तींच्या सहभागाने हा सन्मान सोहळा संपन्न झाला. सुविख्यात गायक जयदीप बगवाडकर यांनी किशोरदांची एकाहून एक अप्रतिम गाणी ह्या निमित्ताने सादर करून रसिकांच्या मनाला आनंद दिला. संगीत संयोजन हे अमेय ठाकूरदेसाई यांचे होते तर औपचारिक सोहळ्याचे निवेदन विनीत श्रीकांत गोरे यांनी केले.